Friday 26 May 2017

हीच माझी कहाणी: भाग ५


"आजी एक प्रश्न विचारू?"

"मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते. तुला वाटलं असेल की मला समजलं नाही पण सकाळपासून तू जरा अस्वस्थ आहेस हे दिसतंय मला. तुझ्या ह्या अस्वस्थेचं कारण काय त्याचा अंदाज आहे मला. तुला हाच प्रश्न पडला आहे ना की हा रोहन कोण आहे?"

"हो. म्हणजे काल तुम्ही म्हणालात की तुम्ही रोहनशी अशाच गप्पा मारायचा. पण मग हा रोहन कोण हे सांगितलं नाही."

"सांगते.."

"मी आणि रोहन अशी आमची टीम होती. आम्ही अशाच गप्पा मारायचो. मस्त नाटक सिनेमाला जायचो. फिरायचो. त्याला हे सगळं खूप आवडायचं आणि मलाही. रोहन दिक्षित म्हणजे माझा नातू. छान नातं होतं आमचं. मी ही छान रमायचे त्याच्या सोबत. पण मग त्या काळ्या दिवशी.."

रोहन बद्दल सांगताना आजी जरा भावूक झाल्या होत्या.

"२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सगळं कसं छान चाललं होतं. मी, माझे मिस्टर, मुलगा, सून आणि नातू रोहन. घर अगदी माणसांनी भरलेले असायचे. रोहन तेव्हा पाच वर्षांचा होता. चिमुकल्या पावलांनी घरभर हिंडायचा. बोबड्या आवाजात बोलायचा. आजी..आजी.. करत सारखा अवती भवती फिरायचा. त्याच्या मागे मागे धावताना माझी दमछाक व्हायची खरी पण गंमतही तितकीच यायची. वेळ कसा जायचा हे समजायचंही नाही. आम्ही दोघं खिडकीपाशी बसून गप्पा मारायचो. तो मला कार्टूनच्या गोष्टी सांगायचा तर मी ही त्याला बोध कथा सांगायचे. ते दिवसच वेगळे होते. त्याला कार्टून फिल्मस् खूप आवडायच्या. मग आम्ही असंच बाहेर जायचो. फिल्म बघायचो. हॉटेलात खायचो. इथेच कट्ट्यावर येऊन बसायचो. ही जागा त्याच्या आवडीची होती आणि म्हणूनच माझीही"

आजी सांगता सांगता थांबल्या. त्यांच्या चष्म्यामागून आलेला तो अश्रूचा थेंब खूप काही सांगत होतं. त्यांचं त्यांच्या नातवावर किती प्रेम होतं हेच ह्यातून दिसत होतं.

"आजी मग आता रोहन कुठे असतो? नाही म्हणजे मी इथे आल्यापासून कधी दिसला नाही किंवा कुठला फोन आला नाही म्हणून विचारलं?"

"फोन आला नाही हे खरं आहे पण कधी येणारही नाही हेही तितकंच खरं आहे."

"का?"

"मला वाटतं उशीर खूप झाला आहे. आपल्याला निघायला हवं."

"पण आजी..."

"चल म्हटलं ना.."

सिनेमा ऐन रंगात यावा आणि तेव्हाच नेमकी वीज जावी. उत्कंठता शिगेला पोहोचावी आणि गोष्ट अर्धवट राहवी. तसंच काहीशी अवस्था माझी झाली होती. रोहन बाबत उत्कंठता ताणली गेली होती.
आम्ही घरी पोहोचलो. आजी फार काही बोलल्या नाहीत. आपल्या खोलीत शांत बसून होत्या. मीही त्यांना काही विचारायला गेलो नाही. त्या दुखावल्या होत्या हे जाणवत होतं. रोहनचा विषय काढून अजून मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता.
मी ही स्वतःशी ठरवलं की आता जो पर्यंत आजी रोहन बद्दल सांगत नाही तो पर्यंत आपण हा विषयच काढायचा नाही. 
दिवसभर आजी सोबत खूप छान वेळ गेला. आईला फोन केला. तिच्याशी दिवसभर घडलेली प्रत्येक गोष्ट शेयर केली. आजींबद्दल सांगत होतो. तिलाही बरं वाटलं ऐकून.
रात्र फार झाली होती . मी खोलीचा दिवा बंद केला. आजींच्या खोलीत डोकावलं तर त्या शांत झोपल्या होत्या. मग मीही झोपलो.
रोहनचा विषय संपला होता माझ्यासाठी पण प्रश्न अनुत्तरीत होताच. रोहन कुठे आहे? आजींचा मुलगा व सून ते कुठे असतील? आजोबा कुठे असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी माणसं असूनही आजी अशा एकट्याच का? ह्या २० वर्षात असं काय बदललं?
हा विषय संपला असं म्हटलं खरं पण मन हे आपुले. विचार करायचे थोडीच थांबतंय. विचारचक्र सुरूच.


to be continued...

- निनाद वाघ




Friday 19 May 2017

हीच माझी कहाणी: भाग ४

भाग १: https://hichmajhikahani.blogspot.in/2017/04/blog-post_28.html


भाग २: https://hichmajhikahani.blogspot.in/2017/05/blog-post.html


भाग ३: https://hichmajhikahani.blogspot.in/2017/05/blog-post_12.html

मन अस्वस्थ झालं होतं. सारखा मनात एकच विचार होता की हा रोहन कोण असेल!

आजींचा मुलगा असेल का? किंवा मग नातू? पण मग त्यांनी त्याच्या बद्दल बोलणं का टाळलं असावं? हा रोहन जो कुणी आहे तो आता कुठे असेल? काय करत असेल? की मग... 
मनात भलते सलते विचार येऊ लागले. हे विचारचक्र असंच सुरू राहिलं आणि ह्यातच रात्र सरली पण त्या प्रश्नाचं उत्तर काही सापडेना.

कसं सांगू तुम्हाला
अंतरी माझ्या काय चाललंय ?
घुसमटलेले विचार
अन् मन खवळलंय..

सकाळी आजी नेहमीप्रमाणे देव घरात पूजा करत बसल्या होत्या. मी ही देवासमोर हात जोडले. पूजा झाल्यावर आजींनी बनवलेला गरमागरम नाश्ता केला.

"काय रे समीर, कॉलेज कधीपासून सुरू होणार?

"१ तारखेला होणार. तो पर्यंत जरा आराम"

"बरं. मग आज बाहेर जायचं का फिरायला? बघ म्हणजे जर तुला चालत असेल तर"

"अहो का नाही चालणार. नक्कीच चालेल"

"ठरलं तर मग. आज बाहेर फिरू आणि मग बाहेरच जेवू."

"चालेल"

आम्ही सर्वात आधी सिध्दिविनायक मंदिरात गेलो. तिथून आम्ही मग शिवाजी मंदिरला मस्त नाटक बघितलं. मग तिथून मग आम्ही हॉटेलात जेवलो.

"एक काम करू आता घरी जाऊ आणि मग सायंकाळी शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर बसू. छान गप्पा मारू"

आजी आज फार उत्साहात आणि आनंदात दिसत होत्या. त्यांना बघून मी ही आनंदात होतो. अर्थात मनाच्या एका कोपऱ्यात 'रोहन कोण' हा प्रश्न होताच. असो.
संध्याकाळी ठरल्या प्रमाणे आम्ही पार्कात गेलो. तिथे कट्ट्यावर बसलो.

"कसा होता मग आजचा दिवस? मजा आली का?" आजींनी विचारलं

"आजचा दिवस खरंच खूप अविस्मरणीय होता. जाम धमाल आली"

"छान. मलाही बरं वाटलं. खूप दिवसांनी मी अशी बाहेर आले. पूर्वी खूप फिरायचे पण मग सगळंच बंद झालं"

" आजी एक प्रश्न विचारू?"

"मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते. तुला वाटलं असेल की मला समजलं नाही पण सकाळपासून तू जरा अस्वस्थ आहेस हे दिसतंय मला. तुझ्या ह्या अस्वस्थेचं कारण काय त्याचा अंदाज आहे मला. तुला हाच प्रश्न पडला आहे ना की हा रोहन कोण आहे?"

"हो. म्हणजे काल तुम्ही म्हणालात की तुम्ही रोहनशी अशाच गप्पा मारायचा. पण मग हा रोहन कोण हे सांगितलं नाही."

"सांगते.." आजी थोड्या हळव्या झाल्या.

"मी आणि रोहन अशी आमची टीम होती. आम्ही अशाच गप्पा मारायचो. मस्त नाटक सिनेमाला जायचो. फिरायचो. त्याला हे सगळं खूप आवडायचं आणि मलाही. रोहन दिक्षित म्हणजे माझा नातू. छान नातं होतं आमचं. मी ही छान रमायचे त्याच्या सोबत. पण मग त्या काळ्या दिवशी.."
आजी सांगत होत्या आणि तितक्यात माझा फोन वाजला.



to be continued...


- निनाद वाघ












Friday 12 May 2017

हीच माझी कहाणी: भाग ३


मुंबईत येऊन आता जेमतेम दोन दिवस झाले होते. ह्या अनोळख्या बलाढ्य शहरात माझं कुणीही ओळखीचं नव्हतं असं जरी मी म्हटलं तरीही आता मात्र मला एक हक्काचं असं माणूस सापडलं होतं. त्या म्हणजे माझ्या केअर टेकर आजी. अगदी दोन दिवसांत आमची छान गट्टी जमली होती. वयानं जरी म्हाताऱ्या असल्या तरी त्यांच्यातील ऊर्जा इतकी अफाट होती की एखाद्या लहान मुलालाही लाजवेल. 
दिवसभर स्वतःला कामात बुडवून घ्यायचं. सतत काही ना काही काम सुरूच.

"काय रे समीर, आज रात्रीच्या जेवणात काय बेत करायचा?"

"अहो आजी, असं काही नाही तुम्ही नेहमी करता तसंच करा. उगाच माझ्यासाठी म्हणून वेगळं काही नको. खरंच"

"वेगळं वगरे काही नाही. उलट तुझ्या आवडीचं करायला मला आवडेल"

"कशाला हो उगाच. तुम्ही थकत नाही का? दिवसभर इतकं काम करत असता ते."

"इतकी वर्ष झाली. एकटीच राहतेय. सगळं स्वतः करते. आधी एकटेपणा जाणवायचा. हे रिकामं घर खायला उठायचं. मग स्वतःला कामात बुडवून घेतलं. मसाले, पापड, लोणची करून विकायचे.. असो.. माझ्या मेलीची बडबड आपली सुरूच राहणार.. तू सांग जेवणाचं काय ते? बिर्याणी करू का? आवडेल का?

"हो आजी. आवडेल"

आजीच्या त्या बोलण्यामागे कुठेतरी एक खंत जाणवली. प्रत्येक माणसाची अशी एक स्टोरी असते. तशीच आजींचीही होती. नक्कीच काहीतरी घडलं होतं त्यांच्या आयुष्यात. खोलवर कुठेतरी उरात जखम होती.
रात्री आजीच्या हातची चमचमीत बिर्याणी खाल्ली. अगदी मायेने त्यांनी केली होती.
जेवणानंतर आजी सगळं आवरून ठेवायच्या. दोन दिवसांत मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे त्या स्वच्छते बाबत फार काटेकोर होत्या. घर कायम नीट नेटकं असायचं.

"आजी ती ताटं द्या मला. मी आवरून ठेवतो"

"काही नको. तू आराम कर. रात्रही फार झाली आहे. झोप हवं तर. माझं होतच आलंय"

"झोप येत नाही मला. आजी जर तुम्हाला चालणार असेल तर आपण छान गप्पा मारूया का?"

"हो चालेल."

"तुम्हाला झोप तर आली नाही ना?"

"नाही. उलट तुझ्याशी गप्पा मारल्या तर छानच वाटेल"

आम्ही खिडकीपाशी बसून छान गप्पा टाकल्या. आजी मला मुंबई बद्दल सांगत होत्या. इतक्या वर्षात मुंबई कशी बदलत गेली त्या बद्दलही सांगत होत्या.
एकीकडे आजीच्या गप्पा तर दुसरीकडे खिडकीतून ती शांत तरीही गजबजलेली मुंबई दिसत होती.

"आजी तुमच्याशी गप्पा मारून खूपच मज्जा आली"

"मलाही छान वाटलं. इतक्या वर्षांनी कुणाशी इतक्या गप्पा मारल्या मी. पूर्वी मी आणि रोहन सुद्धा अशाच रात्री गप्पा मारत बसायचो."

"रोहन?"

"काही नाही. रात्र फार झाली आहे. चल झोपायला"
असं म्हणत त्या आतल्या खोलीत गेल्या. अन् मी पाहत राहिलो त्यांच्याकडे.. मनात असंख्य प्रश्न घेऊन.



to be continued...


- निनाद वाघ



Friday 5 May 2017

हीच माझी कहाणी: भाग २

हीच माझी कहाणी: भाग १ : https://hichmajhikahani.blogspot.in/2017/04/blog-post_28.html

रात्र झाली तशी मनातली भीती अजून वाढत होती. नेमकं काय करावं हेच सुचत नव्हतं. शेवटी पुन्हा दादर स्टेशनकडे जावं आणि तिथल्या वेटिंग रूममध्ये राहावं असं मी ठरवलं. आईला ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. नाहीतर उगाच ती काळजी करत बसली असती. 
सामान उचललं आणि प्लाझावरून दादर स्टेशनला निघालो. नेमका रस्ता माहिती नसल्याने असंच एका गल्लीत शिरलो तर तिथे मला स्वामींचा मठ दिसला. मठाची दारं बंद होती. फक्त एक छोटी खिडकी उघडी होती ज्यातनं स्वामींचा फोटो दिसत होता. मी हातातलं सामान खाली ठेवलं. डोळे मिटले अन् स्वामींकडे प्रार्थना केली.

"स्वामी आज मुंबईत पहिल्यांदा आलोय. काही स्वप्नं पाहिली आहेत ती पूर्ण करायला. तुमचा आशीर्वाद असुद्या. आता सुद्धा खूप एकटं एकटं वाटतंय. भीती वाटतेय. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं योजिले असणार. ह्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा. लक्ष असुद्या"

तिथून पुन्हा स्टेशनकडे चालायला सुरूवात केली. इतक्यात खिशातला फोन वाजला. केअर टेकरांचा होता.


"हेलो..."


"हेलो.. हा कुणाचा नंबर आहे? आताच मी १०-१२ मिस कॉल पाहिले"


"मी समीर बोलतोय. समीर वामन खानोलकर. तुमचा पी. जी.. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. मी मुंबईत आलोय. तुमचं घर सापडेना म्हणून फोन केलेला पण तुम्ही उचलला नाही.."


"सॉरी.. खरंच खूप सॉरी.. मी कामात गुंग होते आणि फोन सायलंटवर होता हे लक्षात आलंच नाही.. आता मिस कॉल पाहिले.."


"मी खूप घाबरलेलो. आता पुन्हा दादर स्टेशनला निघालो होतो."


"आता कुठे आहेस?"


"मी आता स्वामींच्या मठाजवळ आहे"

"अच्छा.. थांब तिथेच.. मी येते तुला घ्यायला."

त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या जिवात जीव आला. खरंच ही सारी स्वामींची कृपा होती. मी पुन्हा हात जोडले आणि मनापासून त्यांचे आभार मानले. 
मी उभा होतो. इतक्यात एक वयस्कर बाई येताना दिसली.

"समीर??"


"हो"


"मी मनोरमा दिक्षित. चल सोबत माझ्या.. दोन बिल्डिंग सोडून आपलं घर आहे."


आम्ही घरी आलो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. सामान खोलीत ठेवलं इणि फ्रेश झालो. दिवसभरात जाम थकलो होतो पण अखेर मुंबईत आलोच ह्या उत्साहात तो जाणवत नव्हता. मला अतोनात आनंद झाला होता.

"काय रे सामान ठेवलं का व्यवस्थित? ये दोन घास गरम जेवून घे.. थकला असशील.. जेवला की बरं वाटेल. शांत झोप लागेल.. माझ्यामुळ्ये उगाच तुझी गैरसोय झाली."


"आजी.. All is well that ends well..तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका"

मी जेवायला बसलो. भूक लागलीच होती. आजींच्या हाताला चव होती. जेवल्यावर छान वाटलं. बिछान्यावर पडलो तशी लगेच शांत झोप लागली. मुंबईतली पहिली रात्र. उद्यापासून एक नवं आयुष्य सुरू होणार होतं. एक नवीन प्रवास.. तो पर्यंत डोळ्यांत स्वप्न घेऊन लागलेली ती पहिली शांत झोप..


रात्र ही सरणार
घेऊन स्वप्नं नवी..
दिवस नवा उजाडणार
सुखाचा आरंभ होणार..



to be continued..



- निनाद वाघ