Friday 30 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ९


जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.


जुने रस्ते नव्या वाटा
जुनेच किनारे नव्या लाटा
जुन्या जखमा नवं दुखणं
जुनेच डोळे नवी स्वप्न
जुनी ठेच नव्यानं लागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी वस्तू नवी किंमत 
जुनाच खेळ नवी गंमत 
जुना झोपाळा नवे झोके
जुनंच घड्याळ नवे ठोके
जुना आशीर्वाद नव्यानं मागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी माणसं नवे छत्र
जुनीच अक्षरं नवी पत्र 
जुने पेच नवे प्रसंग 
जुन्याच अपेक्षा नवे भंग 
जुना स्वभाव नव्यानं वागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..

माझ्या कविता ऐकून आजींनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मलाही खूप बरं वाटलं. दोघे आम्ही खूप आनंदी होतो. गप्पांच्या आणि कवितेच्या नादात मी माझा फोन आत ठेवलाय हे लक्षातच आलं नाही. मी झोपायला गेलो तेव्हा फोन बघितला. त्यावर कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून १७ मिस्ड कॉल होते. मी चक्रावलो. कुणाचे असतील ? मी पुन्हा फोन लावला त्या नंबर वर तेव्हा फोन लागेना आणि त्या विचाराने मला झोप लागेना.

सकाळ झाली. मी अजूनही त्याच विचारात होतो की मला फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण असेल? 
त्या नंबर वर मी पुन्हा फोन लावला. अजूनही लागला नाही. फोनच्या ॲपवर नंबर शोधला तरी सापडला नाही. कदाचित राँग नंबर असेल म्हणून मी विचार सोडून दिला.
बघता बघता मुंबईत येऊन मला दोन आठवडे झाले होते.आज पासून माझं कॉलेज सुरू होणार होतं. मी निघताना आजींचा आशीर्वाद घेतला अन् निघालो.

रिमझिम पाऊस पडत होता. कॉलेजचा परिसर छान हिरवागार होता. मी बिल्डिंगच्या आत शिरलो आणि माझा वर्ग शोधला. सगळेच नवे चेहरे होते. एक बाक रिकामा दिसला. तिथे जाऊन मी बसलो. 

आमचं इंडक्शन शेशन सुरू झालं. प्रत्येक जण आपली ओळख करून देत होते. मी ही दिली. पहिला दिवस असाच गेला. निघताना काही मुलं घोळक्यात उभी होती. नवी नवी मैत्री झालेली पण माझी नजर गेली ती एका मुलावर. तो एकटाच उभा होता. 
मी त्याच्या जवळ गेलो.

"हाय.. मी समीर"

"हाय"

"नाव काय रे तुझं?"

"रोहन.. रोहन दिक्षित"

मी हे नाव ऐकून चक्रावलो. हाच का आजींचा नातू? की फक्त नावात साम्य? मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं.


to be continued...



- निनाद वाघ



Friday 16 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ८



कॉलेजमध्ये मार्कशीट देऊन मी पुन्हा घरी आलो. आजींशी गप्पा मारत बसलो. मी माझ्या वडिलांविषयी बोलणं टाळतो हे आजींना ही माहित होतं. त्यांनी मला ह्या विषयी एकदा विचारलं होतं पण नंतर पुन्हा कधीही हा विषय काढला नाही. कदाचित जसं मी त्यांना रोहनबद्दल विचारायचं थांबवलं होतं तसंच. 
आम्ही वेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. जाताना बसमध्ये भेटलेल्या त्या आजोबांबद्दल सांगत होतो. गप्पांच्या ओघात मी त्यांना म्हटलं की मला लिहायला आवडतं. कविता करतो कधीकधी.

"काय सांगतोस? कविता ?? मला ऐकव की.."

"नाही हो.. येवढं काही चांगलं जमत नाही "

"असू दे. तरीही ऐकव"

"बरं.."

मी माझ्या कवितांची वही आणली.
आजी मी तुम्हाला 'माणूस' ही माझी कविता ऐकवतो. माणूस कसा असावा ह्या संदर्भातील ही कविता आहे.

माणूस

परिस्थितीशी झुंज देणारा 
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही 
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

प्रत्येक प्रश्नांना उत्तर नसले तरीही
शोधायचा त्यांने प्रयत्न करावा..
मनात झालेला विचारांचा गुंता
अगदी अलगद असा सोडवून घ्यावा..

राग आला कितीही तरी
मनात त्याच्या क्रोध नसावा..
कठीण समय आला जरी
चेहरा कायम प्रसन्न असावा..

परिस्थितीशी झुंज देणारा 
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही 
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

"वाह! छान! खरंच आवडली. खूप छान लिहिली आहेस"

"थँक्स आजी"

"अजून एखादी ऐकव ना. आता तर माझ्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत"

"काहीही काय आजी. उगाच माझी मस्करी करताय का.."

"अरे खरंच मनापासून सांगतेय"

"बरं मग मी अजून एक कविता सादर करतो"


जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.


जुने रस्ते नव्या वाटा
जुनेच किनारे नव्या लाटा
जुन्या जखमा नवं दुखणं
जुनेच डोळे नवी स्वप्न
जुनी ठेच नव्यानं लागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी वस्तू नवी किंमत 
जुनाच खेळ नवी गंमत 
जुना झोपाळा नवे झोके
जुनंच घड्याळ नवे ठोके
जुना आशीर्वाद नव्यानं मागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी माणसं नवे छत्र
जुनीच अक्षरं नवी पत्र 
जुने पेच नवे प्रसंग 
जुन्याच अपेक्षा नवे भंग 
जुना स्वभाव नव्यानं वागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..

माझ्या कविता ऐकून आजींनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मलाही खूप बरं वाटलं. दोघे आम्ही खूप आनंदी होतो. गप्पांच्या आणि कवितेच्या नादात मी माझा फोन आत ठेवलाय हे लक्षातच आलं नाही. मी झोपायला गेलो तेव्हा फोन बघितला. त्यावर कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून १७ मिस्ड कॉल होते. मी चक्रावलो. कुणाचे असतील ? मी पुन्हा फोन लावला त्या नंबर वर तेव्हा फोन लागेना आणि त्या विचाराने मला झोप लागेना.


to be continued...


- निनाद वाघ


Friday 9 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ७



बस मधून उतरल्यावर समोरच कॉलेजची इमारत दिसली. इंटरनेट वर फोटो पाहिला होता खरा पण प्रत्यक्षात सुद्धा ती वास्तू तितकीच सुंदर होती.
खरंतर शिक्षणाची आवड मला अगदी लहानपणापासून होती. शाळेत असताना नेहमी चांगले मार्क्स असायचे. देवाच्या कृपेने हुशारही होतो. उच्च शिक्षण घेणं हे माझं स्वप्न होतं.
माझं बालपण हे खरंतर एका छोट्याशा खेड्यात गेलं. घरची परिस्थिती तशी बेताची होती पण आईने झेपेल तसं सगळं केलं. दिवस रात्र राबायची बिचारी. माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च तिने केला. ते कधीच थांबू दिलं नाही. आईने केलेल्या कष्टाची जाणीव मला होती. कॉलेजला जायला लागल्यावर मी सुद्धा एक छोटीशी नोकरी धरली. तिथेच गावातच. पगार काही फार नव्हता पण तेवढीच आईला मदत.
हळूहळू खर्च वाढू लागले. आईच्या ही अवाक्या बाहेर जात होतं सगळं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच टेंशन दिसायचं मला. बाकी कसलंही सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग नाही ना घेता येत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.
एकदा असंच मी तिला म्हटलं की आता पुढचं शिक्षण नको. त्याचा खर्च वाचेल आणि पूर्ण वेळ नोकरी करता येईल. तेव्हा आई खूप चिडली माझ्यावर आणि म्हणाली "जो पर्यंत तुझी आई जिवंत आहे तो पर्यंत तरी तुला असं काहीही करायची गरज नाही. तुला वाटतं ना की पैशाची जुळवाजुळव करताना मला त्रास होतोय. तर हो..होतोय मला त्रास..पण जर तू शिक्षण सोडलं तर मला होणारा त्रास हा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. त्यामुळे पुन्हा कधी शिक्षण सोडण्याची भाषा करायची नाही."
दिवस सरत होते. आम्ही जगत होतो. माझ्या आईची स्वामींवर फार श्रद्धा होती. ती नेहमी म्हणायची की आपण कष्ट करत रहायचे. स्वामी आपल्याला ह्यातून नक्कीच बाहेर काढतील.
तिचा हाच विश्वास खरा ठरला. ऐके दिवशी मावशीचा फोन आमच्या शेजारच्या घरी आला. तिने आईला सांगितलं की कुठलीतरी जुनी जमीन होती म्हणे वडिलांची त्यांच्या. कित्येक वर्ष अशीच होती. ती विकली गेली ३० लाख रुपयांना आणि त्यातून आलेले पैसे तिघं भावंडं वाटून घेणार. आईच्या वाटेला १० लाख रूपये आले.
आमची परिस्थिती बदलत गेली. आईचा ताण कितीतरी कमी झाला. मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तरा नशीब सुद्धा आपलं साथ देतं ह्यावर माझा विश्वास बसला.
हे सगळं सुरू असताना माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं आणि मुंबईच्या कॉलेजात MBA करायचं मी ठरवलं.


आपलं नशीब आपल्या हाती
दोष इतरांना देऊ नका..
आपण घडवू तसंच घडेल आयुष्य
रोष इतरांवर काढू नका..


आमच्या घरात तशी अजून एक व्यक्ती सुद्धा रहायची. सांगायला विसरलो. माझे वडील. पण त्यांच्या बद्दल न बोललेलं बरं..

to be continued...


- निनाद वाघ



Friday 2 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ६



रोहनचा विषय तात्पुरता तरी माझ्यासाठी संपला होता कारण त्यातच अडकून राहिलो तर मुंबईला येण्याचं माझं मूळ उद्दिष्ट बाजूला राहिलं असतं. आजींना हा विषय पुन्हा पुन्हा काढून त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना दुःख होईल असं काहीही वागायचं नाही असं मी ठरवलं.
सकाळी मी माझं सगळं आवरून खोली बाहेर आलो तेव्हा तिथे आजी बसल्या होत्या. आनंदी दिसत होत्या. स्वतः मधे मग्न होत्या. गाणं गुणगुणत होत्या.

"Good Morning आजी"

"काय मग झोप झाली का छान?"

"हो आजी"

"बरं बस इथे. मी गरम कांदे पोहे केले आहेत ते आणते" असं म्हणत आजी किचनमध्ये गेल्या.

"लिंबू पिळून देऊ का?" आतून आवाज आला.

"हो चालेल"

"आणि खोबरं?"

"थोडं चालेल"

आजी आतून छान गरमागरम कांदे पोहे घेऊन आल्या.

"काय रे ते तुझ्या कॉलेजमध्ये तुला मार्कशीट का काय द्यायचा होत्या असं म्हणाला होतास. ते कधी जाणार आहेस?"

"अरे हो. मी विसरलो होतो. थँक्स आजी आठवण केल्याबद्दल. आजच जाऊन येतो."

"चालेल. लगेचच करून टाक. अशा महत्त्वाच्या कामात उगाच दिरंगाई नको."

"हो नक्की."

पोहे खाऊन झाल्यावर मी लगेचच कॉलेजला जायला निघालो. आजी म्हणाल्या होत्या की नाक्यावरच्या बस स्टॉपवर मला बस मिळेल.
मी बसची वाट बघत उभा होतो. गरमीचे दिवस असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या.

"वडाळ्याला जायला बस इथेच मिळेल ना?" मी शेजारच्या माणसाला विचारलं.

"होय"

इतक्यात मला बस येताना दिसली. मी त्यात चढलो आणि एक आजोबा बसले होते त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. अगदी साधी वेषभूषा होती त्यांची.डोळ्यांवर चष्मा. खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काही सुंदर चित्र होती.
मला राहावले नाही म्हणून मी सहज त्यांना म्हटले, “आजोबा, ही चित्र कुठून आणली? अप्रतिम आहेत!”
हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले, "बाळा ही मी स्वतः काढली आहेत."

मला आश्चर्याचा धक्का बसला.

"वाह! तुम्ही चित्रकार आहात ? "

"हो. म्हणजे अगदीच चित्रकार असं नाही पण हौस म्हणून काढतो."

"क्या बात है"

"तू विचारलं म्हणून सांगतो. लहानपणापासून आवड होती. जगातील प्रसिद्ध चित्रकार व्हायचे स्वप्नं पाहिले होते. परंतु चित्रकाराचे उत्पन्न फार कमी. घरच्या लोकांना ते पसंत नव्हते. त्यांचा विरोध होता. म्हणून इच्छा नसताना देखील इंजिनियर झालो. चांगली नोकरी मिळाली. पुढे लग्न झाले. संसार सुरू झाला. आयुष्याच्या चित्रात रंग भरताना माझी आवड मात्र मागे राहिली.
पैसे आले. चांगले आयुष्य मिळाले परंतु आनंद नाही मिळाला. आज मुलं परदेशी आहेत. सुखी आहेत. पत्नीचे निधन झाले. आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर काय मिळालं ह्या पेक्षा माझं स्वप्न अपूर्ण राहिले ह्या गोष्टीचे दुःख जास्त आहे. मनात खंत उरते रे. तुझे काही स्वप्न आहे का? जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. जे आहे ते ह्या जन्मात. एखादी राहून गेलेली गोष्ट पुढच्या जन्मी करीन हे आपल्या अपयशाचे केलेले समर्थन आहे . लक्षात ठेव!"
त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चष्म्या मागून येणारा तो अश्रूचा थेंब हृदयाला चटका लावणारा होता.
बस थांबली. ते उतरले . मी थक्क होऊन पाहत राहिलो…




to be continued...



- निनाद वाघ